शनिवार, ५ एप्रिल, २०२५

खाजगी दवाखान्यांची लूट आणि सरकारी रुग्णालयातील बेफिकिरी – एक सखोल विश्लेषण

 

dinanathmangeshkar hospital caryless
सरकारी रुग्णालयातील बेफिकिरी
650662278344988579/8340148435986465463

माणुसकीचा आटलेला झरा: खाजगी दवाखान्यांची लूट, सरकारी रुग्णालयांची बेफिकिरी आणि आरोग्य व्यवस्थेतील विसंगती

Keywords (शोधशब्द): खाजगी दवाखान्यांची लूट, सरकारी रुग्णालय समस्या, वैद्यकीय भ्रष्टाचार, आरोग्य व्यवस्था विसंगती, डॉक्टरांचा गैरवर्तन, आरोग्य विमा फसवणूक, धर्मादायी रुग्णालय गैरव्यवहार, वैद्यकीय शिक्षण मूल्यशिक्षण


प्रस्तावना

अराेग्यसेवा ही मूलभूत गरज आहे.अराेग्य सेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क आहे.त्यामुळे मोठया प्रमाणात शासकीय रूग्णालय शासन चालवते.अनेक मोहिमा ही राबवते.ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालय ही गैरसोयीची केंद्र झालेली असतात.तसेच सौजन्याची ऐशी की तैशी असते.त्यामुळे लोक खाजगी रुग्णालयाचा पर्याय निवडतात.आधार आणि विश्वास हवा असतो. धीर हवा असतो.खाजगी रूग्णालयात धीर विश्वास व उपचार सौजन्य सारं मिळते पण ते फार किमती असते.ते गोर गरिबांचे कंबरडे मोडणारे असते. अर्थात यात जर नामांकित रूग्णालय असतील तर त्यांचा ही तोरा काही औरचं असतो.

             अपुरे वैद्यकीय ज्ञान व योग्य उपचाराच्या आशेपोटी लोक गुमान त्यांच्या कंपाऊंडरचे, नर्स चे कसली थेरं सहन करतात. अनेक खाजगी दवाखान्यातून स्टार हा प्रशिक्षित नसतो. कमी पगारावर उपलब्ध असणारे ते गरजू पण अडाणी लोक ठेवतात.त्यांनाच जुजबी ट्रेनिंग देऊन काम चालवून घेतात. यावर सरकारचं काही ही नियंत्रण नसते. फीस मात्र भरमसाट घेतली जाते. कुठल्या ही रूग्णालयात जा.तुम्ही सावजचं असतात.सारे मिळून तुमची शिकार ते करणारच असतात.डाॅक्टर लोकांना काय समजतत,ते समजोत पण डाॅक्टरला लोक देव मानतात.मरणाच्या दारातून ते जीव परत आणतात.असा त्यावर विश्वास असतो. डाकरांच ल रुग्णाच्या खिश्यात.. !!!

                              तुम्ही शेतकरी,कष्टकरी असाल तर तुम्हाला ते उपचार करतील असं नाही.तुमची,अर्थीक कुवत तपासण्यासाठी ते तुम्हाला डिपॉझिट करायला सांगतील. तुम्ही ते करं शकला,तर हरकत नाही.नाही करू शकला तर तुम्हाला ते उपचार ही देणार नाहीत आणि सल्ला पण.... शासकीय रूग्णालयात डाॅक्टरांची बेफिकीर पावलो पावली पहावयास मिळते. त्याचं एक कारण असते.अनेक शासकीय सेवेतील डाॅक्टर खाजगी दवाखाने थाटून बसतात. अनेक ठिकाणी त्यांची कन्सल्टींग ही सुरू असते.शासकीय वेळेत त्यांना आपलं दुकानं चालवायचं असतं.राजरोसपणे ते असं करू शकतात. सर्रासपणे... शासनाचं कसलचं नियंत्रण नसते.असलं तरी सारं मॅनेज असते. पैसा कमविण्याच्या लालसेतून रुग्णांची लूट करण्याचा नवा बाजार उभा राहिला आहे. या लेखात आपण खाजगी दवाखान्यांतील लूट, सरकारी दवाखान्यांमधील ढिसाळ कारभार आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेतील विसंगती याविषयी तपशीलवार चर्चा करू. 


खाजगी दवाखान्यांत लूट का वाढते आहे?

1. दर नियंत्रणाचा अभाव

खाजगी दवाखान्यांमध्ये कोणतेही दर निश्चित नाहीत. प्रत्येक हॉस्पिटल आणि डॉक्टर स्वतःच्या सोयीनुसार शुल्क आकारतात. उदाहरणार्थ, मुंबईतील एका नामांकित खाजगी दवाखान्यात हृदय शस्त्रक्रियेचा खर्च ५ लाख ते १५ लाख रुपयांपर्यंत असतो, तर लहान शहरांमध्ये तो २ ते ५ लाख रुपयांच्या दरम्यान असतो.ही असमानता रुग्णांसाठी आर्थिक संकट निर्माण करते. मरणाच्या भिती पोटी लोक जास्त खर्च करणार.त्यांची लूट होते.आपण सारे पहातो.इतकी विसंगती का?कोणत्याही प्रकारचे शुल्क नियंत्रण नसल्यामुळे हॉस्पिटल्स हवे तसे पैसे आकारतात. MRI, CT Scan, ICU, सर्जरीचे दर ठराविक नसल्याने रुग्ण आर्थिक संकटात सापडतो.

2. अनावश्यक चाचण्या आणि औषधे

रुग्णांकडून जास्तीत जास्त पैसे उकळण्यासाठी अनेकदा अनावश्यक चाचण्या केल्या जातात. उदाहरणार्थ, एका रुग्णाला फक्त डोकेदुखी होती, पण डॉक्टरांनी त्याला MRI आणि CT Scan करण्याचा सल्ला दिला,ज्यामुळे १५,००० रुपयांचा अतिरिक्त खर्च आला. रुग्णाच्या मनात भिती निर्माण करून अशी लूट केली जाते. दवाखान्याची व कोर्टाची पायरी चढू नये असं लोक मानतात.आपल्या अयोग्य सेवेविषयी लोकांमध्ये प्रचंड भिती आहे.

फक्त भिती दाखवून रुग्णांना महागड्या चाचण्या आणि औषधांमध्ये अडकवले जाते. डॉक्टर आणि औषध कंपन्यांमधील करारामुळे ही साखळी अधिक बळकट झाली आहे.

3. आरोग्य विमा योजनांची गैरफायदा

विमा असलेल्या रुग्णांकडून बिल फुगवून आकारले जाते. हे हॉस्पिटल आणि विमा कंपन्यांमधील संगनमताचे उदाहरण आहे.आरोग्य विमा असलेल्या रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते.एका केस स्टडीमध्ये असे दिसून आले की, एका रुग्णालयाने १ लाख रुपयांचे बिल फुगवून २.५ लाख रुपये दाखवले, कारण रुग्णाच्या कुटुंबाकडे आरोग्य विमा होता.त विमा कंपन्यांशी ती एक लूटचं असते.रूग्ण ते देयक अदा करणार नाही याचा अर्थ कंपनीची लूट करायला हे मोकळे आहेत का? नामांकित आणि धर्मादायी रुग्णालये गरिबांची फसवणूक करतात. अनेक नामांकित रुग्णालये आणि तथाकथित धर्मादायी रुग्णालये सरकारी जमिनीवर आणि अनुदानावर उभारली जातात. मात्र, त्यांनी दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता नसते. सौजन्य ही नसते.अनेकदा ते गरीबांना जागा शिल्लक नाही ही सबब सांगून अक्षरशः हाकलून देतात. उदाहरणार्थ, मुंबईतील एका प्रसिद्ध धर्मादायी रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या बेड्सवर उच्चभ्रू रुग्णांना भरमसाट शुल्क घेऊन दाखल केले होते.सरकारी मदतीवर उभे राहूनही हे रुग्णालये गरिबांची लूट करतात आणि केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णांनाच प्राथमिकता देतात. 

औषध कंपन्यांशी साटेलोटे:

डॉक्टर आणि औषध कंपन्यांमधील साटेलोट्यामुळे अनावश्यक महागड्या औषधांची शिफारस केली जाते. २०१९ मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, ७०% डॉक्टर हे विशिष्ट औषध कंपन्यांच्या उत्पादनांना प्राधान्य देतात आणि त्याबदल्यात मोठे कमिशन घेतात.आपल्या,रूग्णालयात आपलंचं औषधाचे दुकान थाटतात.जास्त ओषधं विकली गेली की नफा आणि कमीशन ही वाढवून मिळते.कशासाठी पैशासाठी...!!! सेवे पेक्षा पैश्याचा महत्व दिले जात आहे. डॉक्टर समाजसेवक नसतात ते अव्वल धंदेवाईक असतात.समाज त्यांना समाजसेवकाचा किताब बहाल करतात. 

अप्रशिक्षीत न अनानुभवी स्टाफ

अनेक खाजगी दवाखान्यातून स्टा हा प्रशिक्षित नसतो. कमी पगारावर उपलब्ध असणारे ते गरजू पण अडाणी लोक असतात. डॉक्टरांना कमी खर्चात नोकर हवे असतात. अनेक डॉक्टर कामगारांच अर्थीक शेषण ही करतात. अप्रशिक्षीत लोंकांनाचं जुजबी ट्रेनिंग देऊन काम चालवून घेतात.यावर सरकारचं काही ही नियंत्रण नसते. अर्थात त्याचे काही पर्यवेक्षण ही नसते. फीस मात्र भरमसाट घेतली जाते. सरळ सरळ लोकांची लूट करून कमी खर्चात सुमार दर्जाची सेवा पुरवून डॉक्टर पैसा छापत असतात. Bottom of Form

 

नामांकित व धर्मादायी रुग्णालयांचा खरा चेहरा

सरकारी सवलतीवर उभ्या राहिलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर अन्याय होतो. राखीव बेड्स उच्चभ्रू लोकांसाठी वापरले जातात आणि सामान्य जनतेला "जागा नाही" असे सांगून बाहेर काढले जाते.मांकित आणि धर्मादायी रुग्णालये गरिबांची फसवणूक करतात. अनेक नामांकित रुग्णालये आणि तथाकथित धर्मादायी रुग्णालये सरकारी जमिनीवर आणि अनुदानावर उभारली जातात. मात्र, त्यांनी दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये पारदर्शकता नसते. सौजन्य ही नसते.अनेकदा ते गरीबांना जागा शिल्लक नाही ही सबब सांगून अक्षरशः हाकलून देतात. उदाहरणार्थ, मुंबईतील एका प्रसिद्ध धर्मादायी रुग्णालयाने गरीब रुग्णांसाठी राखीव ठेवलेल्या बेड्सवर उच्चभ्रू रुग्णांना भरमसाट शुल्क घेऊन दाखल केले होते.सरकारी मदतीवर उभे राहूनही हे रुग्णालये गरिबांची लूट करतात आणि केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णांनाच प्राथमिकता देतात.



सरकारी रुग्णालयांतील समस्या

  • फार्मासिस्ट नसणे, औषधांचा अभाव, डॉक्टर अनुपस्थिती, भ्रष्टाचार या समस्या शासकीय सेवेत सामान्य झाल्या आहेत.

  • डॉक्टर खाजगी प्रॅक्टिसवर अधिक लक्ष देतात. त्यामुळे रुग्ण दुर्लक्षित होतो.

  • शासकीय रूग्णालयात डाॅक्टरांची बेफिकीर पावलो पावली पहावयास मिळते. त्याचं एक कारण असते.अनेक शासकीय सेवेतील डाॅक्टर खाजगी दवाखाने थाटून बसतात. अनेक ठिकाणी त्यांची कन्सल्टींग ही सुरू असते.शासकीय वेळेत त्यांना आपलं दुकानं चालवायचं असतं.राजरोसपणे ते असं करू शकतात. सर्रासपणे... शासनाचं कसलचं नियंत्रण नसते.असलं तरी सारं मॅनेज असते. पैसा कमविण्याच्या लालसेतून रुग्णांची लूट करण्याचा नवा बाजार उभा राहिला आहे

  • सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा काळाबाजार, अनुदानाच्या रकमेत अपहार,उपकरणांच्या खरेदीत भ्रष्टाचार अशा घटना सर्रास घडतात. २०१८ मध्ये महाराष्ट्रातील एका सरकारी दवाखान्यात औषध खरेदीसाठी दिलेले कोट्यवधी रुपये गैरवापर केल्याचे समोर आले होते.




डॉक्टरांवरील हल्ले: कारणे आणि परिणाम


  • चुकीचा उपचार, भिती निर्माण करून आर्थिक शोषण, संवादाचा अभाव – या सगळ्या गोष्टी हल्ल्यांना कारणीभूत ठरतात.

  •  डॉक्टर-रुग्ण संबंधातील तणाव अनेक वेळा रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक झाल्यामुळे किंवा चुकीच्या उपचारांमुळे डॉक्टरांवर हल्ले होतात.उदाहरणार्थ, पुण्यात २०२२ मध्ये एका डॉक्टरावर रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी हल्ला केला होता. अर्थिक पिळवणूक व उपचाराची न दाखवलेली तत्परता हे ही या संतापाचे कारण असते.अनेकदा गंभीर रुग्णाच्या बाबतीत नातेवाईकांना अवगत ही करण्यात आलेले नसते. रुग्णाच्या आजाराबाबत गांभीर्य ही लक्षात आणून दिले जात नाही.काहीवेळा गैरसमजातून ही हल्ले होतात. २. राजकीय हस्तक्षेप सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप असतो.अनेकदा मोठ्या रुग्णालयांचे संचालक हे राजकीय नेत्यांचे हितसंबंध पाहतात. उदा.दिल्लीतील एका नामांकित हॉस्पिटलच्या संचालक मंडळात राजकीय नेत्यांचा समावेश असल्याचे उघड झाले होते. राजकीय लोक अशा ठिकाणी संचालक असू नयेत पण अनेकदा राजकारण्यांचे नातेवाईक व स्नेही अशी पद बळकावून बसलेले असतात.त्यामुळे अश्या लोकांचा प्रभाव गडद होत जातो.ही रूग्णालय मूळ हेतू पासून दूर जाता

  • राजकीय हस्तक्षेपमुळे काही हॉस्पिटल्स "सेटिंग" वर चालतात. प्रशासन गप्प बसते.


वैद्यकीय शिक्षण आणि मूल्यशिक्षणाची गरज

वैद्यकीय शिक्षण केवळ तांत्रिक ज्ञानावर आधारित असून त्यात नैतिकता आणि मूल्यशिक्षणाचा अभाव आहे. डॉक्टरांनी केवळ व्यवसायिक दृष्टीकोन ठेवण्याऐवजी समाजसेवेच्या भावनेने काम करावे, यासाठी शिक्षण पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, जपान आणि युरोपियन देशांमध्ये वैद्यकीय शिक्षणात नैतिक मूल्ये शिकवली जातात, ज्यामुळे तिथले डॉक्टर अधिक पारदर्शक आणि माणुसकीला प्राधान्य देणारे ठरतात. संवेदनशील माणसचं फक्त माणुसकीच्या दृष्टीने काही करू शकतात.प्रत्येक क्षेत्रात व्यवसायीकता वाढली आहे.त्यालाच यशस्वी माणूस मानलेच जात असेल तर प्रकाश आमटे डाॅक्टर व खैरनार यांना यशस्वी कसं समजायचं? भ्रष्टाचारी लोकांना मिळणारा सन्मान: चुकीच्या प्रेरणेचा स्रोत समाजात भ्रष्ट आणि अनैतिक मार्गाने पैसा कमावणाऱ्या लोकांना मोठा सन्मान मिळतो, हे आरोग्य व्यवस्थेतील लूट आणि भ्रष्टाचाराला अधिक चालना देते. डॉक्टर, हॉस्पिटल्सचे संचालक, औषध कंपन्यांचे अधिकारी यांनी प्रचंड पैसा मिळवला तरी त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही.अशा वातावरणात प्रामाणिक आणि सेवाभावी डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी हे दुर्मिळ होत चालले आहेत.
  • नैतिक मूल्यांचा अभाव: डॉक्टर केवळ तांत्रिक दृष्टिकोनातून तयार होतात.

  • सेवाभावाची उणीव: व्यवसायिकता वाढली आहे, पण समाजासाठी योगदान देणारे डॉक्टर्स दुर्मिळ झाले आहेत.


समाजात भ्रष्ट लोकांना मिळणारा सन्मान

अशा लोकांचे उदात्तीकरण हे तरुण पिढीला चुकीची दिशा दाखवते. सत्य आणि सेवाभावाने काम करणारे व्यक्ती दुर्लक्षित राहतात.


समस्या सुटण्यासाठी उपाय

  1. दर नियंत्रण आयोग स्थापणे

  2. स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा

  3. आरोग्य विमा यंत्रणेतील पारदर्शकता वाढवणे

  4. सरकारी हॉस्पिटल्समध्ये नियमित ऑडिट व सामाजिक अंकेक्षण

  5. वैद्यकीय शिक्षणात मूल्यशिक्षण अनिवार्य करणे

  6. कडक कायदे व कारवाई यांची अंमलबजावणी


निष्कर्ष

माणुसकीचा झरा आटू नये यासाठी सरकार, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती, आणि आपण सर्वांनी सजग होणे गरजेचे आहे. आरोग्य ही केवळ सेवा नाही, ती एक जबाबदारी आहे. ती व्यापारीकरणाच्या मार्गाने न जाता समाजहितासाठी वापरली गेली पाहिजे.


Meta Title: खाजगी दवाखान्यांची लूट आणि सरकारी रुग्णालयातील बेफिकिरी – एक सखोल विश्लेषण
Meta Description: भारतातील खाजगी दवाखान्यांतील लूट, सरकारी रुग्णालयातील भ्रष्टाचार आणि वैद्यकीय शिक्षणातील मूल्यशिक्षणाचा अभाव यावर आधारित सविस्तर SEO ब्लॉग.



गुरुवार, ३ एप्रिल, २०२५

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज

अर्धा कोयता’ – श्रमिकांच्या संघर्षाचा जिवंत दस्तऐवज

अलकानंदा घुगे-आंधळे यांचा 'अर्धा कोयता' हा कथासंग्रह नुकताचं वाचनात आला.कथासंग्रहाचे शीर्षकावरून आपला असा समज होतो की,हा ऊसतोड कामगाराच्या जीवनावर अधारित कथांचा संग्रह असेल पण अगदीच तसा नाही तो.या कथासंग्रहात ग्राम्य जीवनाच्या खडतर संघर्षाच्या चटके देणा-या ही अनेक कथा आहेत.

                                                                      वाटयाला आलेला संघर्ष,खेड्यातील कष्टप्रद खडतर जीवन,दारिद्रय,अज्ञान,मतलबी राजकारण,व्यवस्थेने निर्माण केलेली अनेक आव्हान व त्या आव्हानाला भिडणारी कमालीची जिद्दी माणसं या सा-या गोष्टींनी लेखिकेचे भावविश्व समृध्द झालेले दिसते आहे.जीवनातील खडतरता व अभावाची परिस्थिती व त्या परस्थितीने पिलेली माणसं हीच लेखिकेच्या लेखनाची मूळ प्रेरणा ठरलेली दिसते आहे.

                                                       या कथासंग्रहात ऊसतोड कामगारांच्या जीवनाची परवड व खेडयातील माणसांचा भयाण संघर्ष या कथामधून जाणवतो आहे.ग्रामीण भागातील शेतक-याचे,मजुरांचे जगणे केवळ हलाखीचे नसते तर ते सततच्या संकटामुळे जगण्याचा चंग बांधणा-या माणसाची ती एक लढाईचं असते.हा असंघटित संघर्ष कसा गडद होत जातो याचा वस्तुपाठच या कथांमधून मांडण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे.

                              'आलिया भोगासी असावे सादर' या तुकोबाच्या उक्ती प्रमाणे आपल्या वाट्याला जे दुःख आले आहे ते भोगावे लागणार आहे.हे जगणं त्यांनी स्वीकारलं आहे.या झुंजार वृत्तीने एक एक पात्र लढत राहते आहे.झुंजत राहते आहे.प्रत्येकाची लढाई वेगळी असते. आपलीच जीवा भावाची माणसं एकमेकांचा संघर्ष कठीण करत असतात हे कटू असलं तरी सत्य लेखिकेन अनेक कथामधून मांडले आहे.

                                    माणसामाणसतील उभे राहणारे संघर्ष,फाटत जाणारी नाती,विस्कटत गेलेली कुटूंब,मतलबी राजकारण,बेगडयासारख्या जपलेल्या अभासी प्रतिमा हे सारं गावातल्या माणसाठी शापच ठरलेले आहे.कुटूंबातील संघर्ष ही माणसाचं जीवन अधिक खडतर करतो.’बगीचाकथेतील जना असेल,’आळकथेतील संपत असेल,’यशोदा’ कथेतील यशोदा असेल,’मंगळसूत्रकथेतील आप्रुगी.’शेवता कथेतील शेंवता असेल.अश्या अनेक स्त्रीयांच्या जगण्याची परवड या कथामधून लेखिका प्रभावीपणे वाचकासमोर मांडत राहते.लेखिकेच्या भवतालचा पट आपल्या समोरून सरकत जातो आणि वाचक कथामध्ये गुंतत जातो.

                                                       कथामधून नायकपेक्षा जास्त कथामधून खंबीर नायिका  त्यांनी रेखाटलेल्या दिसत आहेत.अर्थात त्या मध्यम वर्गीय स्त्रीयां सारख्या स्त्रीवादी चळवळीत अडकलेल्या नाहीत तर त्या आपली जगण्याची लढाई लढत आहेत.स्वत:स्त्री असल्यामुळे अनेक नायिका रंगवण्यात येणे स्वभाविकच आहे. फक्त स्त्रीयांच्या भावविश्वातच  लेखिका गुरफटून गेलेली  नाही तर खेडूतांच्या जीवनांच्या अनेक समस्येला शब्दबध्द करण्याचा प्रयत्न ही तिने  केला आहे.

                             दंश कथेतील शारदा,कौटूंबीक संघर्ष वाटयाला आलेली अफवा कथेतील सुबी,’छेड कथेतील दुर्गा,’विम्याचे पैसे या कथेतील दारूबाज नव-याशी झुंजत संसाराचा गाडा ओढणारी मुक्ती असेल,वृध्दाश्रम जवळ करणारी यशोदा कथेतील यशोदा,’नकोशी कथेतील तुळसा,शेंवता,‘अर्धा कोयता’या कथेतील खंबीर कांता,या सा-या  कथामधून प्रत्येकीचा संघर्ष वेगळा आहे.खंबीरपणे त्या लढत आहेत.सकारात्मक दृष्टीकोन या सा-याच कथामधून आपल्याला दिसेल.हाच लेखिकेचा लेखनाचा हेतू ही असेल असं वाटते आहे.

                        आळकथेतील नायक संपत,खचून जाऊन फडच पेटून देणारा फड कथेतील भीमा,न संपणारा संघर्ष वाटयाला आलेलावळहई कथेतील आप्पा,’अफवेचे पीक’नात्याच्या गुतंत्यात अडकलेला हताश सदा.या सा-या कथाशोंकातिका आहेत पंरतु नकोशी,ईद का चाँद,भेट,या कथामधनू सुखात्मिका ही छान रंगवल्या आहेत.जगण्याची उभारी देणा-या या कथा आहेत.

                            कथेमध्ये माणसचं नुसते नायक नाही तर बगीचा कथेतील बाग,नख-या कथेतील बैल,शिक्षा कथेतील अख्खा गावातील स्त्रीयाच नायक म्हणून पुढे येतात. असे आगळे वेगळे पण नायक लेखिकेन खुबीने उभे केले आहेत.

                               जसे कडवट झुंज देणारे अनेक माणसं असतात,तसेच खलनायक ही बेरकी आहेत.या कथा मधून तुम्हाला प्रत्येकवेळी माणसचं खलनायक म्हणून भेटतील असं नाही.वास्तवातं ही तसं असतं नाही. समाज, व्यवस्था, निसर्ग आणि नशीब ही माणासाच्या आयुष्यात अनेकदा खलनायक  ठरत असतात. या कथामधून ही दारिद्र्य,अज्ञान,अंधश्रद्धा व समाज व्यवस्था व राजकारण ही खलनायक म्हणून पेश होत राहतात.शिक्षा कथेतील खलनायक अख्ख गावच आहे.सामाजिक विषमताच खलनायक म्हणून पुढे आलेली दिसते.त्यामुळे या कथांना एक सार्वत्रिक सामाजिक परिमाण लाभले आहे.त्यामुळेच अनेक पुरस्कार पदरात पाडून घेताना अलकानंद घुगे-आंधळे यांची कथा आपल्याला दिसते आहे.

                          अलकानंदा घुगे-आंधळे यांच्या लेखनाची भाषा अत्यंत सहज आहे.संवाद आणि वर्णने ही ग्रामीण वास्तवाला धरून आहेत.शब्दयोजना सरळ आणि मोजकीच आहे.त्यात एक लय सापडते.ती लयचं माणसाला कथा मध्ये गुंतून ठेवते.वाचकांना कथेत गुंतवून ठेवण्यासाठी निवेदन शैली व शब्दसंयोजन महत्वाचे असते.बोलीभाषाचा वापर सर्रास केलेला आहे.’आता बया..! महा जीव तुमच्यात आन्‍ तुमचाजीव खेटरात,’’आता कहयाला बोलीती ती पांढरी पाल,’ ‘लई मस्ती आली का ग टवळे, नांदयाला आले तशी अजून कोणी नवा जून केला नाही.च्या मायाला झक मारली न कुठून ऊस लावला.अश्या शब्दांची पखरंड पानोपानी दिसते त्यामुळे संवाद प्रभावी झालेले आहेत.

                         सा-याच कथामध्ये तृतीय पुरूषी निवेदन शैली आहे.त्यामुळे कथा एक सारख्या वाटतात.एकजीनशीपणा उतरल्या सारख्या जाणवतात.निवेदनशैलीमध्ये अनेक पर्याय वापरायाला जागा होती पण लेखिकेने तसं काही केले नाही.

                            या कथांमधील पात्रे आपले अस्तित्व शोधत जगतात ती नुसती परिस्थितीला शरण जाणारी नाहीत, तर आपल्या हक्कांसाठी लढणारी आहेत.उरातली आग तशीच ठेवून डोळयात उत्तुंग स्वप्न रंगवणारे ही माणसं आहेत.अर्धा कोयता हा केवळ ऊसतोड मजुरांच्या दुःखाची कहाणी नाही, तर त्यांच्या संघर्षाचा,त्यांच्या जिद्दीचा दस्तऐवज आहे. अरविंद शेलार यांच मुख्यपृष्ठ  कथांच्या आशयाला साजेसं साधलं आहे.परिस प्रकाशनाने ही आपला जीव त्यात ओतला आहे.आघाडीचे लेखक बाबूराव मुसळे,यांची नेमक्या शब्दांतील प्रस्तावना कथासंग्रहाचे ढाचा सांगून जाते.त्यांची पाठराखण ही आहे.नेमक्या शब्दांत संग्रहाचे सार त्यांनी आस्तिक शब्दांत मांडले आहे. चारचौघात जायचं म्हणल्यावर थोडं सावरून आवरून जायचं असतं.,थोडसं नटून थटून ही..!!अगदी तसचं काहीसं इथं घडले आहे. बुकशेल्पवर उठून दिसेल असा हा कथासंग्रह  साधला आहे.

                     हा कथासंग्रह केवळ सहानुभूती जागवत नाही, तर वाचकाला त्यांच्या जगण्याचा विचार करायला लावतो.ग्रामीण जीवन समजून घेण्यासाठी, श्रमिकांच्या जगण्याचे तपशील अनुभवण्यासाठी हा संग्रह वाचायलाच हवा.साहित्यात वास्तववादी मराठी लेखनाचा ओघ वाढतो आहे. अर्धा कोयताहा त्याच धारेतील महत्त्वाचा टप्पा आहे. लेखिकेच्या शैलीमुळे या कथा मराठी साहित्यात अधिक गडद आणि परिणामकारक ठरतील.त्या कमालीच्या अश्वासक आहेत.

                                                                                      परिक्षण: परशुराम सोंडगे, बीड

 पुस्तकाचे नाव: अर्धा कोयता (कथासंग्रह)

 लेखिका: अलकानंद घुगे-आंधळे

 प्रकाशन: परिस पब्लिकशन सासवड,पुणे

मंगळवार, २५ मार्च, २०२५

सामाजिक न्यायासाठी एल्गार पुकारणारा काव्यसंग्रह- वीरा राठोड

 'युद्ध पेटले आहे' हा सामाजिक न्यायासाठी एल्गार पुकारणारा काव्यसंग्रह- वीरा राठोड

कवी वीरा राठोड भाष्य करताना


बीड – साहित्य म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर ते समाजाच्या मनातील आंदोलनाची अभिव्यक्ती असते. सामाजिक अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या भावना शब्दरूपात मांडत, कवी बाळासाहेब नागरगोजे यांनी रचलेल्या 'युद्ध पेटले आहे' या महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व संस्कृती मंडळ अनुदान प्राप्त काव्यसंग्रहाचा भव्य प्रकाशन सोहळा नुकताच बीड येथे पार पडला.


क्रांतिकारी उद्घोषणांचा सोहळा

हा प्रकाशन सोहळा केवळ साहित्यिक कार्यक्रम नव्हता, तर तो परिवर्तनाच्या निर्धाराचा महोत्सव होता. प्रगतिशील लेखक संघ व एकता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात क्रांतिकारी गीतांनी वातावरण भारावून गेले. शाहीर समाधान इंगळे, शाहीर अमरजीत बाहेती आणि नभा यांच्या स्फूर्तीदायक गीतांनी उपस्थितांची मने जागृत केली.


शहीद दिनाचे औचित्य साधून अभिवादन


कार्यक्रमाची सुरुवात शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव तसेच अवतारसिंह ‘पाश’ आणि साळूबाई डोरले यांच्या प्रतिमांचे पूजन आणि अभिवादन करून करण्यात आली.


काव्यसंग्रहाचे महत्त्व व त्याचे सामाजिक प्रतिबिंब



साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते कवी वीरा राठोड यांनी या काव्यसंग्रहाचे सखोल विश्लेषण करताना नमूद केले की,

"नागरगोजे यांच्या कवितांमध्ये केवळ शोषितांच्या वेदनांची तडफड नाही, तर त्यांच्या हक्कांसाठी एल्गार पुकारणारी गर्जना आहे. ही कविता अन्यायाविरोधात उभी राहण्याची प्रेरणा देते आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष करण्यास भाग पाडते."


कवी बाळासाहेब नागरगोजे यांचे भावनिक मनोगत


"ही कविता केवळ माझी नाही, ती माझ्या मातीची आहे. माझ्या कष्टकरी आई-वडिलांच्या अश्रूंची आहे. भगतसिंहांचे जाज्वल्य विचार हीच माझी काव्यप्रेरणा आहे," असे कवी बाळासाहेब नागरगोजे यांनी भावनिक शब्दांत सांगितले.


विद्रोह, आक्रोश आणि परिवर्तनाचा संदेश


आंतरराष्ट्रीय साहित्य अभ्यासक जयपालसिंह शिंदे यांनी नमूद केले की,

"जागतिक साहित्याचा प्रभाव नागरगोजे यांच्या कवितांमध्ये जाणवतो. विद्रोह, आक्रोश आणि परिवर्तनाची आशा ही साहित्याची प्रेरणा राहिलेली आहे आणि तीच भावना त्यांच्या कवितांतून स्पष्टपणे दिसून येते."


काव्याचे शब्दशिल्प आणि सामाजिक जाणीव


प्रा. ललिता गादगे मॅडम म्हणाल्या की,

"या कविता केवळ वेदनांचे प्रकटीकरण नसून, त्या परिवर्तनाची स्फूर्ती देणाऱ्या आहेत." तसेच, प्रा. सुधाकर शेंडगे यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की,

"ही कविता समाजशिक्षकाची भूमिका घेत क्रांतीची दिशा दाखवते."


मान्यवरांची उपस्थिती आणि वाचकांचा प्रतिसाद




कार्यक्रमास अनंत कराड, डॉ. रामदास नागरगोजे, माजी कॅप्टन प्रल्हाद बांगर, राजकुमार कदम, गोकुळ पवार, ॲड. करूणा टाकसाळ, राजेंद्र गोरे, नवनाथ मिसाळ, संजय सावंत, रमेश बडे, अजित तांदळे, प्रमोद सानप, ॲड. महेश भोसले, प्रकाश घाडगे, वर्षा केंडे यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी आणि श्रोते उपस्थित होते.


वाचकांनी कवी बाळासाहेब नागरगोजे यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कवितांवरील प्रतिक्रिया मांडल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर समाधान इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन येडेश्वर नागरगोजे यांनी केले.


निष्कर्ष:

"युद्ध पेटले आहे" हा केवळ एक काव्यसंग्रह नसून, तो सामाजिक परिवर्तनाचा एक मजबूत आवाज आहे. हा संग्रह वाचकांना अन्यायाविरोधात उभे राहण्याची प्रेरणा देतो आणि क्रांतीसाठी सज्ज होण्याचे आवाहन करतो.


📖 हा लेख तुम्हाला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवा आणि हा प्रेरणादायी संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा!



शनिवार, २२ मार्च, २०२५

युध्द पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

युध्दं पेटले आहे – जगण्याचा चंग आणि संघर्षाच्या गर्जना करणा-या माणसांच्या कविता.

'युध्द पेटले आहे 'हा बाळासाहेब नागरगोजे यांचा पहिलाच कविता संग्रह.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेतून अनघा प्रकाशना मार्फत प्रसिद्ध करण्यात आला आहे.तो नुकताच वाचण्यात आला.
पिढयानपिढया वाटेला आलेला संघर्ष व काळजात घर करून राहिलेल्या वेदनांचा परिपाक म्हणजे हा कविता संग्रह आहे.
होरपळत गेलेली स्वप्न,व्यवस्थेने खुडून घेतल्या गेलेल्या जगण्याच्या आशा,वाटयाला आलेलं दारिद्रय व उपेक्षित जिणं.मराठवाड्यातील ग्रामीण भागातील वास्तव,त्याचे चटके,उपेक्षितांचे प्रश्न,सामाजिक विषमतेमध्ये भरडत गेलेले माणूसपण.जातीवादाचे उसळलेले डोंभ,दांभिक राजकारणात होरपळत जाणारी पण जगण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करणारी माणसे इ.गोष्टीने कवीचं भावविश्व आकारत गेलेले असावं याचा प्रत्ययं आपल्याला कविता वाचतानी सतत येत राहतो.संपूर्ण शोषण मुक्तसमाज हे भगतसिंगाचं स्वप्न उरी घेऊन कवी धडपडतो आहे.हीचं हया कवीची काव्यप्रेरणा आहे असे आपल्याला अनेक कविता वाचताना जाणवते.
               या तप्तव्यवस्थेच्या जाळात होरपळून निघताना मनाला फुटलेल्या उकळीला कुठला ताल सूर आणि लय असू शकतो का? अलंकारिक शब्दाच्या व यमकाच्या मोहात बाळासाहेब नागरगोजे यांच्या कविता गुंतून पडत नाहीत.उकळणं जिथं नैसर्गिक तितकचं या कविता पण अकृत्रिम व स्वभाविकचं आहेत.भावनेच्या कल्लोळात अंतरंगातील शब्द उसळत राहतात.ताला सुराचे साज ती लेतं नाही.हल्लीची मराठी कविता कृत्रिमतेच्या अनेक साच्यात अडकून पडू लागली आहे.बाळासाहेब नागरगोजे यांची कविता तसल्या चौकटीत अडकत नाही तर त्या सा-या चौकटीत उलथून प्रकट होणारी आहे.
                               या कवितात विद्रोह आहे पण ऊरबडवेपाणा नाही.आक्रोश आणि टाहो नाही तर संघर्षाच्या गर्जना त्यात आहेत.आपल्या समोर असलेले प्रत्येक शस्त्र हाती घेऊन पिसाट झालेल्या भणगं माणसाची ही कविता आहे.कवीचे एक एक शब्द शस्त्रप्रमाणे अंगावर कोसळत राहतात.
 ‘युद्ध पेटले आहे’ हे शीर्षक असलेली कवितेतूनच त्याचा प्रत्ययं येतो.
भगतसिंह आभाळातून अवतरत नाहीत.
तो भयाण प्रतिकूलतेतही
फुटणारा अंकुर आहे.
भगतसिंह म्हणजे फक्त शरीर नव्हे
मृत्यूने ओढून नेलेल्या युगाचा अंत नव्हे.
युगानुयुगे चिरंतन असू शकतात अश्या विचारावर ही कविता बेतत जाते.अभावने व अस्वस्थतेने अकाराला आलेल्या भावविश्वात ही कवी जगण्याचा चंग बांधतो.
‘प्रिय डॉमिनिक’ या कवितेत कवी म्हणतो.
तू मेली असतीस तर
मी झोपलो असतो निंवात
पण हाय !
तू जगायचा निर्णय घेतलास.
आपल्या आईच्या वाटयाला आलेलं जगणं व संघर्षाची या जगात कुठे ही नोंद घेतली जाणार नाही.कष्टक-यांच्या घामाचे रक्ताचे इथे मोल नाही.दखल कुणी घेत नाही.याची खंत त्याच्या मनात आहे.उपेक्षित माणसाची व्यथाचं क्रांतीचे बीज पेरत असते ना?
‘खांडसरीत ढोरमेहनतीने तिच्या अंगावरची
कातडी सोलून निघाली होती.
पण या घटनेची कुठे ही नोंद नाही.’
तिसरा डोळा उघडून महादेव तांडव सुरू करतो.जग विनाशाच्या बिंदूवर असते.तेव्हा जग हादरत.युगालाचं आपले युगपुरुष उभे करण्याची अपरिहार्यता असते.ते होणारच असते.ती सृष्टीची ही अपरिहार्यताचं असते.
'या क्रांती मार्गावरचा मुसाफिर म्हणून
मी पहिला नव्हतो
आणि शेवटचा ही नसेल..!!
परिवर्तन ही विश्वाची अटळता आहे तसेच शोषणाची वंशावळ ही युगानुयुगे तशीच चालत आलेली आहे.
हि विषवल्ली आजची नाही रे
युगानुयुगे ती फोफावत आलेली आहे.
ज्यांनी ब्रिटनला,जाॅन ऑफ आर्कला रसरसत्या आगीत लोटले.क्रॉसवर्ड जीससच्या हातावर खिळे ठोकले.सत्य सांगणा-यांच्या डोळ्यांच्या खाचा केल्या....
खिचपत पडणे,पिचून जाणे, तुटणे. वाकणे किंवा मोडणेचं मान्य नसलेला प्रचंड आशावाद पाानोपानी पेरत जाणा-या
 या कविता आहेत.
समग्र क्षेत्रात सुरू झालेला संघर्ष कवी विशद करतो.युध्दाचा शेवट काय असेल याची फिकीर सैनिकाला नसते.जग बुडाले तरी त्याची त्याला पर्वा नसते.
युध्द अटळ असते.ते कुणी लादत नाही.लादून घेत ही नाही.समाजात स्वार्थ पिपासू,सत्ता पिपासू लोक फसवे मुखडे घालून वावरतात.
धर्माच्या जातीच्या गुंगीत ठेऊन माणसाला धूंद बनवतात.ती धूंदी माणसाचा मेंदू बधिर करते.
भकास मराठवाडय़ातील कंगालत्व ते आपल्या प्रखर शब्दातून मांडत राहतात.
चोहीकडून घेरलेले असले तरी कवी हताश होत नाही.तो सर्वांना आव्हान करतो.गस्त जागी ठेवा.
अंधाराच्या उरावर काठी आपटत पहाटेची स्वप्न पाहणारा नायक या कविता मधून तो उभा करत राहतो.
'फक्त
सत्तेच हस्तांतरण
म्हणजे स्वातंत्र्य नव्हे
लढा संपलेला नाही.
स्वातंत्र्य अजून मिळालेले नाही.'
 कवितामध्ये शब्द संयोजन कवीच्या समृध्द अनुभव विश्वाचं, वाचनाची व व्यासंगाची फलनिष्पती आहे. राजकीय फसवणूक आणि माणसातील माणुसकी हरवत चाललेला काळाच्या पाठीवर ही कविता आपले ओरखडे ओरखडीत पुढे सरकते आहे.
‘पुढच्या युध्दाच्याच
गर्भधारणेचा मोसम असते
इतिहासाचे गाढव
पुन्हा त्याचं चौकात तसेच ओसाड उभे आहे.’
या संग्रहातील कविता शोषण,अन्याय, क्रांती आणि सामाजिक परिवर्तनाच्या धाग्यांभोवती गुंफलेल्या आहेत.कवीच्या लेखणीतून व्यक्त होणारे विचार हे केवळ वेदनांचे वर्णन नसून संघर्षाच्या गर्जना आहेत.परिस्थितीस शरण जाणारी नाहीतर ती या व्यवस्थेविरूध जंग पुकारणारी कविता आहे.हे युध्द शोषकाच्या विरोधात शोषितांनी पुकारलेले आहे.यातून श्रमिकांचे जगणे आणि त्यांच्या दुःखाची खोल समजूत प्रकट होते.कवी आपल्या' चक्रव्यूह' या कवितेत आपल्या मनाची पराकोटीची अस्वस्थता आपल्यापुढे मांडत राहतो.
'माझ्या दारातनू रक्ताचे पाट वाहत असताना
मी मनशंतीसाठी नाही प्रयत्न करू शकत
ते रक्ताचे पाट रूंद होत जातात त्यांची उंची वाढत जाते
आणि ते थेट माझ्या पायाला स्पर्श करतात
तेव्हा मी लेखणी उचलतो
पाझरत राहतात काळजातून
साचलेल्या माझ्या वेदना.
कवी समाजव्यवस्थेतील ढोंगीपणावर घणाघाती टीका करतो.
 

 बाळासाहेब नागरगोजे यांच्या कवितेची भाषा ही सरळ, साधी नाही ती गुढ आहे.अंशत: अबोघ आहे.पण अत्यंत प्रभावी आहे.ती कुठेही अलंकारिक शब्दांच्या शोधात गुंतलेली नाही,तर ती अधिकची धारदार होत गेलेली आहे.
मुक्तछंदातील सहजशैली,आक्रोश आणि विद्रोहाचा सूर,बोलीभाषेतील थेट संवाद
संस्कारांची जाणीव,सामाजिक विसंगतीवर तिरकस आणि प्रखर विद्रोह ती करत राहते.
‘तुला माहितीये?
आपल्या आयुष्याचे बांधिल गि-हाईक उरावर घेत
माझ्यातील वेश्या
खंगत चाललीये.’
त्यांची कविता वाचताना जाणवतं की, हे शब्द कुठल्याही लयीत बसवलेले नाहीत, तर ते युद्धात उचललेली शस्त्रं आहेत.ते कुठेही सौंदर्याच्या चौकटीत अडकत नाहीत कारण त्यांचा उद्देश मनोरंजन नाही तर परिवर्तन आहे.
    "युद्ध पेटले आहे" हा संग्रह समकालीन मराठी साहित्याच्या विद्रोही धारेतील एक आहे.पारंपरिक कवितांप्रमाणे ही कविता निसर्ग, प्रेम,भक्ती यांसारख्या विषयांभोवती फिरत नाही तर समाजाच्या गाभ्यातील दुःख आणि संघर्षाच्या खोल तळाशी जाऊन भाष्य करते. माणसाच्या मनात राखेत गुडूप झालेल्या निखा-यावर ती फुंकर घालते.गुलाम या कवितेत कवी म्हणतो.
’खूप प्रिय असतात
त्यांना गुलाम.
गुमान काम ऐकणारे सांगकामे '

कवींच्या कविता जशा तत्कालीन समाजातील दुःख प्रतिबिंबित करतात,तश्याचं मनाच्या गाभा-यात खोल तेवत असणा-या घटना,व्यक्ती व भवना अपोआपच बाहेर येत राहतात.
साळू काकू,सुंदरा अक्का ,आण्णा,तुम्ही गेल्यानंतर आणि रद्दी या सारख्या कविता मनाच्या तळाशी चाललेला कोलाहलचं फक्त प्रकट करत नाहीत तर युक्रेन,इस्त्रायलचे युध्द सारख्या जागतिक घटनावर ही आपल्या संवेदाना प्रकट करत राहतात.त्यामुळेचं कवितेंचा पट विस्तारात जातो.
                                नामदेव ढसाळ यांच्या विद्रोही साहित्याची आठवण या कविता वाचतानी येते.काही अंशी नामदेव ढसाळ यांची जी अस्वस्थता कवितेतून जाणवत राहते.एक भणगता ही भाषाशैलीत जाणवत राहते.या कवीच्या कवितेची उग्रता आणि वास्तवदर्शी भाषा प्रभावी वाटते.बाळासाहेब नागरगोजे यांच्या कवितेत आशावाद आणि क्रांतीची भाषा आहे.हा संग्रह केवळ संवेदनशील वाचकांसाठी नाही तर तो संघर्ष करणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसासाठी प्रेरणादायी आहे.हे कवितासंग्रह वाचल्यानंतर एक निष्क्रिय वाचकही विचार करायला लागतो, आणि हाच या कवितांचा सर्वात मोठा प्रभाव म्हणता येईल.


                              












                              ही कविता केवळ तक्रारीत अडकलेली नाही,तर संघर्षाला प्रवृत्त करणारी आहे.केवळ व्यक्तिगत दुःख मांडत नाही, तर संपूर्ण समाजाच्या वेदनांची साक्ष देणारी आहे पंरतु विद्रोह,अक्रोश व संघर्षानेच या कविता भरावलेल्या आहेत.त्यात मानवी जीवन सुखच्या आशेवरचं पुढे सरक असते.मानवी जीवनातील सुखाचा जो पदर असतो.तो कुठे ठळकपणे पुढे येत नाही.भाषाशैलीत सहजता व सुलभता नाही.कधी कधी आशय फारच गुढ होत जातो व कविता अबोधाच्या चकोरीत फिरत राहते.
 कवीने पहिल्या प्रयत्नातच संघर्षशील,आक्रमक आणि परिवर्तनवादी कविता साकारल्या आहेत. त्यामुळे हा संग्रह मराठी साहित्याच्या विद्रोही परंपरेत एक नवीन आणि मजबूत आवाज म्हणून पुढे येईल यात शंका नाही.
        साहित्या अकादमी पुरस्कार प्राप्त कवी विरा राठोड यांची पाठराखण व कवी अनंत कराड यांची प्रस्तावना या संग्रहाला लाभलेली आहे ही या संग्रहासाठी मोठी उपलब्धी आहे.मोजक्या शब्दात त्यांनी कवीच्या भावविश्वाचा व कवितेचा आशय व्यक्त केला आहे. मुखपृष्ठ ही वेगळया धाटणीचं असलं तरी प्रभावी आहे व संग्रहातील कवितांवर ते चपखल बसलं आहे. सुभाष कुदळे,यांनी ते चित्तारले आहे तीची भाषा असली तरी एकदम उचच्तम काव्यानुभूती देणारा हा कवितासंग्रह सर्वांनी वाचायलाच हवा असा आहे.
वाचताय ना?
पुस्तकाचे नाव:युध्द पेटले आहे
कवी : बाळासाहेब नागरगोजे
प्रकाशन : अनघा प्रकाशन, ठाणे
                                                                                                           परशुराम सोंडगे,बीड
                                9527460358

रविवार, १६ मार्च, २०२५

श्रावणी बाळ ,'मला माफ कर 'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं जीवन.बीड पुन्हा हादरलं.


श्रावणी बाळ ,'मला माफ कर
'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं जीवन.बीड पुन्हा हादरलं.
बीड जिल्ह्यातील  केज तालुक्यातील विनाअनुदानित  शाळेतील शिक्षक  धनजंय नागरगोजे यांनी आपल्या मुली उद्देशून  फेसबुकवर  भाव पोस्ट करत आयुष्य संपवलं.
श्रावणी बाळ,मला माफ कर'भावूक फेसबुकवर पोस्ट करत संपवलं
दुदैवी-शिक्षक-धनजंय-नागरगोजे
होय,शिक्षक पण आत्महत्या करतात.
काल-बीड-पुन्हा हादरलं.
काल 'पुन्हा बीड हादरलं. एका शिक्षकाने फेसबूक पोस्ट करून आपलं आयुष्ष संपवलं.

मान्य तो खचला.त्यानं त्याच्या खडतर जगण्याच्या या जंग मध्ये 'पराभव पत्करतला. त्याचा इथल्या व्यवस्थेने बळी घेतला.आपत्या डोळ्यातली उरली सुरली स्वप्न कुणी खुडून घेतली. जाळून टाकली की माणूस हताश होतो.खचतो. माणसं मरतात.आत्महत्या करून मरतात? हल्ली आपलं मरणं जाहीर करून लोक मरत आहेत.

 नाही झेपला त्याला हा संघर्ष. तो गेला.भवसागरातील बुडबुडा शांत झाला.
 या आथांग भवसागरातल तो लुप्त झाला. कदाचित त्याच्या आयुष्याचा हा पूर्ण विराम असेल? त्यानं आपण होऊनच आपला जीवनरेषाखंड आखून घेतला. त्याचं हे जाण अनेक प्रश्न उमटून गेले.नुसता माणूस मरत नसतो.
 श्रावणीचा बाप..हिरावला. 
कुण्या सुवासिनीचं कपाळ पांढर झालयं.
कुणाचा पोटचा गोळा गेलाय.
 त्या दुःखाची आपण कल्पना ही करू शकत नाहीत.
 हे झाल आपलं आपल्या शरीरात हदय नावाचा एक अवयव आहे .डोळ्व्यातले आसवं आपण सहज ढाळू शकतो? एवढच करू शकतो ना आपण त्या दुदैवी जीवासाठी?
    या दुःखाच्या जाणिवा संस्था चालकाना नसतात कारण ते लांडग्यांच्या काळजाचे असतात.त्यांना दया मया काही नसते.त्यांच ह्रदय हे दगडाची असतात. पैसा व सत्तेचा एक माज आसतो.तो माज माणसाला असंवेदनशीलशील बनवतो. प्रत्येक जीवाचं जगण्याची आपली काही सुंदर स्वप्न असतात.
 काही आशाचं मूळं मनात खोल रूजत गेलेली असतात. त्या स्वप्राच्या मागे तो धावत राहतो.जीव स्व्नलोलुप असतो.
     मासे कसे पकडतात?गळाला आमिष चिकटवलेले असतं.गळ पाण्यात फिरत राहतो. मासे आमिष पकडण्यासाठी प्राण परात आणि शेपटात आणून तडफडत असतात.गळ नरडीचा लागतो. तडफडत राहतात मासे.सा-या हालचाली निर्थक असतात 
      तशी ही माणसं कायम विनाअनुदानित शाळेत अडकली जातात.जगणंचं मरण होऊन जातं त्यांच. कायम विनाअनुदानित शाळेतील हे शिक्षक शिक्षिका त्या तडफणा-या माश्या सारखी असतात. अर्थिकदृष्टया माणूस कुमकवत होत गेला की तो खचत जातो.आपल्या आशा आकांक्षाला मुरड देत राहतो.तो तडजोडी करतो.त्याला तडजोडीची सवय जडते. त्याला कुणाशी पंगा घ्यायचा नसतो.पाय बांधलेले डुक्कर कुणाशी थोडचं पंगा घेऊ शकत? ते फक्त तडफडू शकतं.बेकू नाही म्हणून तोंडात बोळा कोंबण्याची ही सोय असतेचं की कुणी तरी सांगितलेले.वाचलेले आठवते 
 अंधारा नंतर प्रकाश असतो.प्रत्येक रात्री नंतर हासरी सकाळ असते.असं थोडचं असतं आयुष्यातल्या सा-याचं वाटा फुलांनी सजवलेल्या.हे ही दिवस जातील या आशेवर तो दिवस ढकलत राहतो.
      तो ढकलत नाही.तो त्या चाकोरीत फिरत राहतो. कुणी तरी मातीत बीज होऊन गाड्रून घेतल्याशिवाय झाडं डवरतं नाही.फुलांनी फळांनी सजत नाही. आपल्या आयुष्याची तर माती झाली आहे.किमान आपल्या या त्यागातून आपल्या मुलांच्या आयुष्यात तरी पहाट उगवेल अशी अशा असते, 
त्या पुसाटश्या आशेचा अंकुरचं छाटून घेतला गेला तर? तू फाशी घे. एक जाग रिकामी होईल? आम्हाला ती भरता येईल? अस कुणी तरी सांगत आणि हा माणूस स्वतःला मरून घेतो.
  व्यवस्थे विरूध्दचं बंड विनाशाला अंगावर ओढून घेते निर्ढावलेले गिधाडे हे सोडणार नसतात. त्यांना पण काळ सोकावून च्यायचा नसतो.आपला दरारा संपण म्हणजे आपलं साम्राज्य धोक्यात येणं असतं.
      प्र्येकाला आपलं साग्राज्य प्रिय असतं.त्यासाठी वाटेल ते.कायपण. त्यातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होते.ती पण अतिशय क्रूरपणे.आपली दहशत हीच तर त्या गिंधाडाची ताकद असते. आपल्याला ही हलाल करून मारतील अशी भिती धनंजय नागरगोजे यांना ही वाटलीं.
     मरण ही कोणत्याचं जीवाला हालहाल करून हवं नसतं.भय काल्पनिक असतं.त्याचा एक भोवरा असतो.त्यात जीव गुरफटत राहतो.भिरभिरत राहतो.त्यातूनच ही आत्महत्या झाली जगण्यासाठी नाही मरण्यासाठी त्यांनी दोर जवळ केला.
      आता ज्याची नावं टाकली. त्यांच्यावर गुन्हें दाखल होतील.अटकपूर्व जामीन ही होईल. केस चालू राहिल, कोर्टाच्या अभिलेख्यावर पण..
. पुन्हा कुणी शिक्षक आत्महत्या करणार नाही. याची ग्वाही कुणी देंणार नाही.
हमी तर नाहीच नाही. ज्यांनी एका माणसाच्या रक्तावर रंगपंचमी केली. त्या नराधमासोबत आपले न्यायाधीश रंग उधळत असतील तर ? न्याय कसा असेल? पळवाटा तर आताच आखून घेतत्या असतील ना? आपण या व्यवस्थेचा धिक्कार तरी करणार आहोत का? का उसळेल्या झुंडीत सामिल होणार आहोत?

गुरुवार, १३ मार्च, २०२५

शिमगा: बोंबलायचा आणि धम्माल करण्याचा सण..!!!




शिमगा सण म्हणजे बोंबलायचा सण.शिमग्याला होळी म्हणतात,हे लयीत उशीरा कळलं आम्हाला एक मारकुटे मास्तर होत कुलकर्णी  ते फार शुध्द बोलायचं त्यानं आमच्याकडून होती हा शब्द घोटून घेतला होता पण आम्हाला शिमगा आवडायचा.शिमग्याला बोंबलायचं नि पोळी दुधावर वरपायची हेच माहित होतं.होळी रे होळी नि पुरणाची पोळी.. !!! 

एकाचं एक सण असा होता तो आमच्यावर फुल डिपेंन्ड  असायचा.पोरा नि जर शिमगा लयं सिरीअस  नाही घेतला तर आमच्या भेटू पाटलांकडून लयं टेन्शन यायचं.लाकडं गोव-या कश्या आणणार.लोक लयीत दिलदार असत्यात.त्यांना म्हटलं कुणी लाकड किंवा गोव-या आणा तर कोण आणतोय. सारं हात हालवली येणार.त्यामुळे पाटलांकडून आमची म्हणजे बाप्पाची व परम्याची गँग लागे.तेव्हा  सरकारला नापासाची चिंता नसे.आमचा बाॅस बप्या सलग पाच बा-या नापास झाला होता.त्याच्या बरूबरची पोरं पार दहावीला गेले.हा आमच्याच वर्गात.सा-यात टोंगळा..!! त्याची सरकारला नाही व कधी त्याच्या बापाला ही नापास होतोय म्हणून चिंता वाटली नाही. बप्या तर डेंजरस माणूस होता.

टेन्शन लेने का नही देने का? हा त्याचा मंत्र.

भैरू पाटील देई आम्हाला चिमकून.पाटलाचा पाठींबा भेटला वर आम्हाला कोण आठवीत असतं? तेव्हा कॅलेंडर हा प्रकार नव्हताच.मग शिमगा जवळ आलाय हे कसं कळणार?  गोव-याची कलवड  व लाकडं लोकांनी लपायला सुरू  केले की,आम्हाला क्लिक होणार.शिमगा आ रहा है. करो तय्यारी..!!

  आमच्या गँगचा प्रमुख बप्या त्याला टेन्शन  येणार गोव-या व लाकडं जर नाही चोरली तर शिमगा कसा होणार? मग काय शाळा सुटली की,आमचं हे धाडसत्र सुरू होणार.कुणाच्या परसात शिर, कुणाच्या गोठयात शिर.कुठून कुठून गोव-या सरपण आणलयंच जायचं.जाताना लपून छपून जायचं.येताना मात्र बोबलत यायचं.आम्ही सारी होळीची लेकरं....


आडव येईल त्याला मूठ मूठ खापरं. बोलला आता..!! 

कधी हरताळ खेळत जायचं.लाकड घेऊन यायचं.छत्रपती महाराजांचा गनिमी  कावा मास्तर आम्हाला शिकवी.त्याचा उपेग आम्ही शिमग्याच्या सणासाठी वापरतं.गनिमी कावा करूनचं आम्ही हे करत.सुरांची लूट केल्यासारखं आम्हाला ते वाटे.त्यात बाप्या आणि गँग कुणाचा कसूर भी काढत.घराच्या भांडणाचा भी राग निघ.एखादयाचा आख्खा कलवड खल्लास करायचा.बोलायची सोय नाही.होळीचं लेकरं...!!कोण ऐकून घेतेय? गोव-या लाकडं नाही आणलं की होती कशी करणार? आमच गॅग जुळली की अजून एक दोन गँग ही आम्हाला येऊन मिळत.

होळी है बुरा न मानो ही बोंब तर ठरलेलीच असे.

आम्ही  असं चोरून गोव-या वगैरे आणतो हे आमच्या घरी ग-हाणं केलं.कुणी टोमणं मारलं,तर मग मर गया वहो. आमच्याशी वाकडं,म्हंजी परसात नाही लाकड . असा पंगा घेणारं कुणी भेटलं तर त्याच्या मागे आम्ही बोंबलत  चालणार. त्याला पार जेरीस आणणार.

गावात आम्ही असं मेहनत करीत म्हणून होळी पेटवली जायची. गोव-या लाकडं आणण्यचं कोण? भला मोठा डोंगर रचावा तसा लाकड व गोव-याची होळी रचली जाणार.पाटील ती पेटवणारं.तिचा डोंभ झाला की पोरं...नुसते बोंब मारत. त्या भोवती नाचतं.

एक होत पोरी आणी बाया तिकडं फिरकत  नसतं.लयी घाण घाण...शिव्या पोरं देणार. घाण बोलायचं.बोबंलायचं. उड्या मारायचं...!! नुसती मज्जाच मज्जा...!! पोरं शिमग्याची दिवशी लयी भी उंडारू नाहीत म्हणून शाळाला मास्तर सुट्टी  देत नाहीत अस आम्हाला पक्कं वाटत होतं. शाळाला सुट्टी नाही दिली तरी आम्ही थोडचं शाळेचं तोंड बघणार असतो.एखादा शाळात गेलाच तर सारे जण त्याला घेरात घेई.त्याला कशाची तलप होणारयं पुन्हा? 

      लाकडं गोव-या चोरी न करता मागून घ्यावीत बोंब मारू नाही असे छान छान सुविचार आमचे  सर सांगत पण आमच्या गावची लोक फार दलिदंर ते सहजा सहजी लाकडं नि गोव-या देत असतेत व्हयं? सरला काय माहितीयं? पाटलांचा भी रेटा असचं की.लाकडं नि गोव-या चोरलची का पण लय भारी मज्जा असते?होळीच्या लेकराला कुणीचं काय म्हणतं नसे.घरी एखादं कलागत व्हायची पण त्याला काय आम्ही जुमानत नसतं.घरी जायचं.पोळी नि दूध वरपायचं? आलेच बाहेर.भारी मज्जा असे.गोकूळया लयं भारी सोंग घेणार. पारध्याचं. झोळी घेणार.. फाटकं तुटक  बंडी घालणार." तुकडा वाढं ग माय म्हणणार. पालख्यांच्या आवाज काढणार. त्याच्या मागे चिगुरखाना असे. नुसती फिदीफिदी हसतं. 

तेव्हं फक्त भज्याची भीक घेणार. दुसरं काहीचं झोपी घेणार नाही.

"आयला,हयो लयीचं माजुरा पारधी दिसतोय लका." असं कुणी म्हणं.तसं गोकुळात फुगत असे.घरोघर फक्त भजं मागत फिरत चांगल  पाचपन्नास  घर घेतली की ते साँग कुठं तरी थांब. त्याला रामदास्या हेल्प करी.भजाचं लयी मोठा स्टाॅक त्याच्याकडे होई पुन्हा आमची गँग त्या भजावर तुटून पडे. गोकुळात आमचा बाॅस असे.अशी बोळीतले सोंग सारे मंदिरापाशी येतं.मग ऐका ऐकाच सोंग साजरं होई.ते सोंग म्हणजे नुसता तमाशाचा असे.स्क्रिप्ट  नाय आणि ब्रिप्टं नाय.लगेच  सुरू.

   एखाद्या वर्षी  जर ह-या ना-याचा तमाशाला आला तर सोंग आटोपते घेतं.तमाशाला रंग चढे.तारी व वैशी या नायकीणी पारं माणसाला येडं करून सोडीत.त्यांच चावट बोलणं.पोर सोरं- पोरी बाकी म्हतारी कोतारी तरणी ताठी  माणसं एन्जॉय  करीत.संस्कार बिस्कारं अश्या भानगडीत कुणी पडतं नसे.तमश्या नाही आला की सोंग रंगत जाई.ना-याचं सोंग ठरलेलं असं.ना-या खर तर सालगडी पण सोंगात मालक होऊन राहयचा.त्याचा लयं रूबाब असे.त्याचे तीन सालगडी असत. गडयाच व मालकाचं  हे सोंग फारच रंगे.मालक गड्याला नुसतं पळी.गडी भी सटकरं  असावी  लागतं. नुसता पळू पळूच घाम  निघे.

माजं घोंगड कुठे रे? मालक जोरात घोंगड फेकून देई. गड्याने घोंगड आणून द्यायचं तेव्हां गडायाचं लंगोट फिटायचंमाझं लंगोट फिट रे.

माजं गठूठं कुठं रे... मालक भिर्र दिशी गुठंठ फेकून द्यायचा. त्या तीन गडयाची हालहाल करून सोडं. लोकांची मात्र हासून हासून पोटं दुःखाची येळं येई. नुसता हशाच हशा..!!! शिमगा असा फुल्ल एन्जॉय करतं.दुस-या दिवशी तर धुळवडचं.कसले रंगबिंग आलेत.चिखूल, रेंदा आणि गटारचं पाणी यानचं माणस एकमेकाला बरबटून घेतं.सिलव्हर कलर फासून कुणी ही कुणाचं माकडं करून टाकत असे.



गडी माणस ब-यापैकी चंद्रावर  गेलेली असतं. ते हवेतच चालतं.त्यात छुटूरमुठूर  कलागती भी होतं पण बेवडयाच्या कलागती कोण सिरीअस  घेतयं? माणसाला सारं हवं असे.आता यातलं काहीचं राहिलं नाही.सारं सारं संपून गेले आहे. शहर बदली आहेत तसे गावं ही बदली आहेत. गोव-या लाकडं आता पाहयाला भेटत नाहीत.पर्यावरणाचं पण टेन्शन नव्हतं तव्हा.आता सण आला की पर्यावरणस्नेही  नावाचे प्राणी येतात जगाची चिंता करत बसतात असले चिंतातुर जंतू फार नव्हते. गावची पंग झालेली माणसं जग बुडत म्हणल्यावर कंबर कसून कामाला लागली असती.नाय तरी हे जग कुणाला पायजे असते?

        आता माणसं सोशल  मिडीयावर  होळी साजरी करतात फेसबुक व व्हाटस् अप वरून शुभेच्छांचा धो धो पाऊस पाडतात.होळीच्या शुभेच्छा देतात. दुर्गुणांचा नाश केला जातो. आपण आपले दोष जाळून टाकण्यासाठी होळी पेटवायची असते.असे सारे म्हणतात.होळी तर दरवर्षीच येते.पेटते पण सद्गुणी माणसं कुठचं दिसतं नाहीत. नेमकं होळीत आपण काय जाळत आहोत?

होळी नि संस्कार ? हे नाय बुवा आपल्याला पटतं.

होळी फुल्लं एन्जॉय  करायचा सण..!! उपदेशाचा डोस पिण्याचा नाही.

मस्ती करायचा सण..!!

आता ठरवा.आपुन काय करायचं?

संशयाचा व्हायरस

  संशयाचं व्हायरस फोटो सौजन्य pinterest  माझ्या लग्नानंतर काही आठवड्यांनी रवीच्या जवळच्या नातेवाइकांच्या लग्नाला आम्ही गेलो होतो. रवीच्या न...