धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं
पुस्तक परीक्षण: सोंडगे परशुराम,बीड 9527460358
![]() |
धर्मयोगिनी अहिल्यादेवी- आजच्या पिढीला मूल्यांचा आरसा दाखवणारं पुस्तक by Dr.Ashok banger |
प्रस्तावना
डॉ.अशोक बांगर लिखित धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर हे पुस्तक नुकतचं
वाचण्यात आले.पुस्तक लहान असलं तरी अहिल्यादेवी यांची चरित्रात्मक तोंड ओळख करून देणारे
आहे. "
युगचं आपले युग पुरूष जन्माला घालत असतो.ती त्या काळाची गरज
असते.अर्थात अहिल्यादेवी ही याला अपवाद नाहीत. अहिल्यादेवीचं कार्य,शौर्य व संघर्ष यावर लेखकांनी वस्तु निष्ठ सहज
सोप्या भाषेत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय इतिहासात अनेक थोर व्यक्तिमत्त्वं उदयाला आली.जी केवळ
त्यांच्या अतुलनीय शौर्यामुळे व कार्यामुळे नव्हे, तर त्यांच्या मूल्यनिष्ठ जगण्यामुळे
आजही प्रेरणास्त्रोत ठरलेली आहेत.अशा तेजस्वी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे
अहिल्याबाई होळकर आहेत.
त्यांच्या जीवनप्रवासाचा आदर्श आपणास सामाजिक न्याय, कर्तव्यनिष्ठा, धर्मसंवर्धन आणि
स्त्रीसक्षमतेचा उत्कृष्ट दृष्टिकोन देतो. जो की हा दृष्टीकोन आजच्या काळाची गरज
आहे. अशी चरित्रे या पिढी पर्यंत वस्तनिष्ठपणे पोहचली पाहिजेत.इतिहास लेखन आपल्या
स्वार्थावर बेतण्याचं पाप हल्ली काही स्वंयघोषित इतिहासकार करत आहेत.त्यामुळे इतिहासाची
दिवसेंदिवस विश्वासर्हताचं कमी होते की काय अशी भिती वाटू लागली आहे.
डॉ.अशोक बांगर यांनी ‘धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर’हया पुस्तकातून त्यांचा जीवनप्रवास सुलभ आणि भावनिक भाषेत वस्तुनिष्ठपणे आपल्यापर्यंत पोचवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.
'‘पराक्रमी मल्हाररांवाचा उदय’ या प्रकरणातून लेखकाने मराठ्यांच्या इतिसहासातील मल्हारराव होळकर घराण्याची पार्श्वभूमी थोडक्यात परंतु प्रभावीपणे चित्रण करून वाचकांना १८व्या शतकाच्या राजकीय-सांस्कृतिक वातावरणाचा परिचय दिलेला आहे. मराठयांच्या इतिहासतील होळकरशाही एक अतुलीनीन शौर्याचं, धैर्याचं,असमान्य कार्याच व संघर्षाचं ज्वलंत पान आहे. त्यामुळे त्यांनी पहिल्याचं प्रकरणात ही दिलेली पार्श्वभूमी पुढील घटनांच्या संदर्भासाठी किती आवश्यक आहे हे पुस्तक वाचताना लक्षात येते.'AhilyabaiHolkar'
इतिहास लेखनात संदर्भांना फारच महत्व असते.अलीकडे शब्दखल करून अनेक अभ्यासक
इतिहास मांडताने दिसतात.इतिहास तर्कावर मांडला नाही जाऊ शकत.डॉ.अशोक बांगर यांनी शब्दोच्छाद या पुस्तकात
कुठे ही केलेले नाही.संदर्भासह हे अहिल्यादेवी
यांच चरित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे.पुस्तकाची मांडणी16 प्रकरणात केली
आहे.त्यामुळे प्रकरणानिहाय इतिहास समजून घेणं सोप झालेलं आहे.नवख्या
वाचकासाठी व शालेय विदयार्थासाठी अशीच पुस्तकं हवी असतात.हे पुस्तक अहिल्यादेवी यांची चरित्रात्मक मांडणी असलेले आहे.त्यात
कथात्मकशैली असलीतरी काल्पनिकतेला व रंजकतेला अजिबात महत्व दिलेले नाही.
![]() |
किल्ले
रायगडावर धर्मयोगिनी अहिल्यादेवी या पुस्तकाचे प्रकाशन करताना देशाचे गृहमंत्री अमित
शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,एकानाथ शिंदे व इतर मान्यवर
तसेच लेखक डॉ.अशोक बांगर |
‘संस्कारांची शिदोरी’,‘भविष्यातील जडणघडण’ या प्रकरणांतून लेखकाने अहिल्याबाईंच्या बालपणातले संस्कार,त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांचा प्रभाव, आणि त्यांची सहज प्रकट होणारी धार्मिकता,करुणा आणि कर्तव्यनिष्ठा यांची ओळख करून दिली आहे.अहिल्यादेवीच्या कर्तृत्वाचं मूळ हे या घडवलेल्या जडणघडणीतच आहे हे लेखक अत्यंत समजूतदारपणे दाखवतो.अहिल्यादेवीचा संघर्ष आणि कर्तव्याचा होत गेलेला अविष्कार लेखक अतिशय सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडत राहतो.
'संकटाशी दोन हात 'या प्रकरणात
लेखकाने अहिल्याबाईंच्या वैयक्तिक दु:खाचा उल्लेख केला आहे.पती खांडेराव होळकर
यांचे युद्धात निधन,सासऱ्यांचे पश्चात्तापदग्ध मन आणि त्या
पार्श्वभूमीवर स्त्रीच्या जीवनात अचानक आलेल्या जबाबदाऱ्या या सगळ्याच गोष्टी
लेखकाने भावनिक संयमानं मांडल्या आहेत.ही सारी प्रकरण अधिक रंजकपणे तेल मीठ लावून ही लिहिता आली
असती पण लेखकाने तो मोह कटाक्षाने टाळला आहे.मुळात डॉ.अशोक बांगर यांचा पिंडच एका चिकित्सक
इतिहासकाराचा आहे.
‘स्वाभिमानी खंडेराव होळकर’, ‘चिरंजीव अहिल्यादेवी’ अशा प्रकरणांतून
लेखन एका ऐतिहासिक नोंदीपेक्षा अधिक नैतिक,सांस्कृतिक स्तरावर
पोहचतं.अहिल्यादेवींच्या जीवनातील प्रत्येक वळण त्यांच्या धर्मनिष्ठ, सोज्वळ आणि
नि:स्वार्थ कार्यभावनेची साक्षचं देणारं आहे या बाबीवरील आपलं भान लेखक ढळून देत
नाही.
‘संकटाशी दोन हात’
आणि ‘राजपदाचा स्वीकार’ ही दोन प्रकरणं
पुस्तकाच्या मध्यबिंदूपर्यंत वाचकाला खेचून नेतात.सासऱ्यांच्या निधनानंतर
अहिल्याबाईंनी एका विधवेने राज्यकारभार हाती घेतला ही गोष्ट त्या काळात अत्यंत
क्रांतिकारक होती.लेखकाने या घटनेचे केवळ ऐतिहासिक महत्त्व सांगितलं नाही तर त्यातून
निर्माण होणाऱ्या सामाजिक मानसिकतेचे विश्लेषणही करण्याचा प्रयत्न केला आहे.
या टप्प्यावर येताना पुस्तक एक
स्त्रीवादी भाष्य बनतं पण हा इतिहास फक्त एका स्त्रीचा इतिहास नाहीतर ‘धर्म आणि समाज’ यासाठी झटणा-या एका
धर्मयोगिनीचा हा इतिहास आहे अशी आग्रही मांडणी लेखक करतो.
‘चंद्रवताचे बंड’, ‘तुमच्या फर्मानास
कोण पुसतो’, ‘सामाजिक समतेच्या प्रेरणा’,‘धर्माचा जाणिवेवर’या प्रकरणांतून
लेखकाने अहिल्यादेवींचा धर्मविषयक दृष्टिकोन,कमालीचा स्वाभिमान, सामाजिक समतेबाबतचा
आग्रह आणि मंदिर बांधकामातून सामाजिक संगोपनाचा प्रयत्न दाखवला आहे.
काशीपासून रामेश्वरपर्यंत त्यांनी घाट, मंदिरं, धर्मशाळा उभारल्या, पण केवळ धार्मिक
कर्मकांड म्हणून नव्हे तर समाजात संवाद, स्नेह आणि संघटन निर्माण व्हावं
यासाठी.लेखकाने हे स्पष्ट केलं आहे की अहिल्याबाईंची धर्मनिष्ठा केवळ
कर्मकांडापुरती नव्हती,तर ती मानवतेच्या सेवेसाठी वाहिलेली होती.त्यांच्या एंकदरीत कार्यावरून त्याचा पर्यसवरणस्नेह
किती तीव्र होता हे आपल्या लक्षात येते. लेखक अहिल्योदेवी यांच्या
व्यक्तीमत्वातील एकएक पैलू वाचकासमोर उलगडून दाखवत राहतो.
प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी’,‘शब्द हाच प्रमाण’ या प्रकरणांतून
अहिल्याबाईंच्या न्यायाधिकार शक्तीचा, त्यांच्या स्पष्टवक्तेपणाचा आणि निर्णयक्षमतेचा उल्लेख
येतो.त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनर्रचनेपासून स्त्रियांच्या
सन्मानापर्यंत अनेक ठिकाणी थेट कार्य केलं आहे हे लेखक अधिक गडद करू पहातो आहे.
'अखेरचा दंडवत’ या शेवटच्या
प्रकरणात लेखकाने अहिल्याबाईंच्या शेवटच्या काळातील त्याग साधेपणा आणि मनोधैर्याचे
वर्णन केलं आहे.त्यांची जीवनशैली,
शेवटच्या श्वासापर्यंत प्रजेची सेवा
करणे हेच त्यांचं धर्मकार्य होतं,यावर लेखकाचा ठाम विश्वास दिसतो. तसे संदर्भ
ही देत राहतो.
डॉ.अशोक बांगर यांची भाषा ही सुगम, भावनाप्रधान आणि विश्लेषणात्मक आहे.पुस्तक हे केवळ शालेय स्वरूपाचं नसून चिंतनपर, मूल्याधिष्ठित आहे.लेखकाने कुठेही अति
नाटकी वर्णन न करता,योग्य संदर्भ आणि साधेपणाने कथन केलं आहे.त्यामुळे वाचक विचार
करायला लागतो.त्यांची शैली विद्यार्थ्यांना समजेल अशी असूनही परिपक्व वाचकांनाही
विचारप्रवृत्त करणारी आहे.विशेषतःवाक्यरचना,उदाहरणांची निवड आणि संक्षिप्त, प्रभावी विधानं ही
लेखनाची ताकद आहे.
हे पुस्तक विद्यार्थ्यांना इतिहास आणि मूल्यशिक्षणाचे एकत्रित
उदाहरण देते.शालेय भाषण, निबंध, स्पर्धा परीक्षा,
समाजशास्त्राच्या अभ्यासात वापरण्यास
अत्यंत उपयुक्त आहे.
तसेच महिला सक्षमीकरण,धर्मनिरपेक्षता,पर्यावरण रक्षण, सामाजिक न्याय, राज्यधर्म यावर
कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांसाठीही हे एक मार्गदर्शक पुस्तक ठरू शकतं यात काही ही शंका नाही.
पुस्तकात काही ठिकाणी संदर्भांची अधिक माहिती किंवा संदर्भग्रंथांची यादी दिली असती तर अभ्यासकांसाठी अधिक उपयोगी ठरले असते. यादी आहे पंरतु ती पुस्तकाच्या शेवटी आहे.प्रकरणानिहाय संदर्भ दिले असते तर समजून घेण्यासाठी अधिक सुलभ झाले असते.काही प्रकरणांत दृश्यात्मक सामग्री (जसे की नकाशे, चित्रं, कोटेशन बॉक्स) दिले असते तर किशोरवयीन वाचकांना अधिक आकर्षक वाटलं असतं.
![]() |
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 345 व्या पुण्यतिथी निमित्ताने राजसभमध्ये अभिवादन कार्यक्रमात धर्मयोगिनी अहिल्यादेवी या पुस्तकाचे लेखक डॉ.अशोक बांगर
“धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर” हे केवळ चरित्र नव्हे,तर एक सांस्कृतिक, नैतिक आणि सामाजिक तथ्यं मांडणारे पुस्तक आहे.अहिल्याबाईंच्या जीवनातील प्रत्येक टप्पा वाचताना आपण वर्तमानकाळात जणू मार्गदर्शन घेतो.त्यांच्या कार्याची प्रेरणा ही काळाच्या पलिकडची आहे.
हे पुस्तक प्रत्येक शाळेच्या ग्रंथालयात,प्रत्येक पालकाच्या
वाचनात, आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या विचारांत असायलाच हवं असचं आहे.तसचं हे पुस्तकं आहे.तुम्ही वाचलयं
का? अवश्य वाचा.
लेखक : डॉ. अशोक बांगर
प्रकाशक: श्री.शिवाजी रायगड मंडळ
पृष्ठे:55
मूल्यं: 70/- रूपये
1 टिप्पणी:
आपल्या वस्तुनिष्ठ समीक्षणाबद्दल आभारी आहे
टिप्पणी पोस्ट करा