सत्यवती: एक शापित कुमारी
![]() |
सत्यवती: एक शापित कुमारी |
अकाशातून सूर्य सृष्टीवर सोनसळी प्रकाशाचा अभिषेक घालत होता.झाडांच्या पानापानावर ते सोन पिवळ उन्हं सा॔डलं होतं.यमुनेच्या गहि-या खोल प्रवाहाच्या उरावर ते नाचत होतं.पक्ष्यांचा मंजूळ कुंजरव भवतालात सर्वदूर पसरला होता.यमुना संथ वाहत होती पण त्यात एक लयं होती.दूर पाण्यात कुणी दोन तीन नौका पैलतीरी सोडल्या होत्या.
यमुनेच्या शांत निळ्या गहि-या पाण्यावर कुणी तरी ओल्या जलरंगात चित्र रेखाटवं तसं ते सारं विलोभनीय दृश्य दिसतं होतं.सत्यवती-एक- शापित- कुमारी
झाडं वेली बहरली होती.फुलं आपल्या गंधराशी वा-याच्या हवाली करत होते.तो मंद गंध सर्वत्र दरवळला होता. रानवेली रंगबेरंगी फुलांनी डवरून आल्या होत्या.
फुलपाखरं? फुलावर घिरट्या घालत होते.इतक्या शुभवेळी प्रभात समयी महर्षी पराशर मंद पावलं टाकीत किना-याकडे चालत होते.वर बांधलेल्या जटा.टोकदार दाढी.काळी पांढरी. भगवं उत्तरीय पांघरलेले.शुभ्र धवल पितांबर नेसलेले...हातात कमंडलू.लाकडी पादुकाचा टकटक अवाज करत होत्या.लाल गर्द मऊशार माती त्या पवित्र चरणस्पर्शासाठी अतुर झालेली..!! मुद्रेवर धीर गंभीरता दाटलेला तेजात माखून निघालेला चेहरा.
तीर्थयात्रेसाठी निघालेले पराशर यमुना पार करण्याच्या विचारात होते.सभोवती आपली धीर आणि गंभीर नजर फिरवली.
जवळचं एक कोळी होता.पराशर ऋषीची नजर त्यावर पडताचं तो धावत येऊन त्यांच्या चरणी लीन झाला.हात जोडून उभा राहिला.
"गुरूदेव..!! कृपा असू द्यावी.सेवेची संधी द्यावी." तो महर्षी पराशरच्या कृपा दृष्टीनेही याचना करत उभा होता.
"यमुना पार करायची आहे." महर्षी पराशर बोलले.
" ती माझी कन्या मत्स्यगंधा आपणांस नदीपार घेऊन जाईल.कृपा असू द्यावी." त्या कोळयाने कृपा दृष्टीची अपेक्षा केली.
महर्षी पराशर यांनी त्यावर एक दृष्टीक्षेप टाकला .ते मत्सगंधेकडे गेले.
मत्सगंधा नावेत बसली होती. काळेभोर केस संभार पाठीवरती रूळला होता. त्यात केसात रानफुलांच्या माला होत्या.त्या जिर्ण वस्त्रात तिचं तारुण्य झाकत नव्हतं.तिचं लावण्य तर.कुणाला आकर्षित करून घेईल असं होतं.
तिच्या त्या कोमल हातात वल्ही होती.सुकुमारी, हास्यवदनी.मदनाच्या पाऊल खुणा तिच्या अंगाखांदावर नुकत्याचं उठू लागल्या होत्या.ती मदनमंजिरी हासत होती.तिच्या सांवळ्या रंगात आणि नाजूक हास्यात एक गूढ आकर्षण होते,पण तिच्या देहातून येणारा मासळीची दुर्गंध तिच्या कोळयाच्या जीवनाची ओळख करवत होता.
ती नाव चालवत असताना तिच्या हालचालीत एक स्वाभाविक लय होती जणू ती नदीच्या प्रवाहाशी एकरूप झाली होती.
महर्षी पराशरांचे डोळे तिच्यावर खिळले.त्यांना तिच्या सौंदर्यात केवळ शारीरिक आकर्षण नव्हे, तर एक दैवी चमक दिसली.त्यांच्या तपोबलाने त्यांना जाणवले की ही मुलगी सामान्य नव्हती.ती चेदी राजा वसु आणि एका शापित अप्सरेची कन्या होती.जिचा जन्म मासळीच्या गर्भातून झाला होता. ते तिच्याकडे आकृष्ट झाले.
पराशरांच्या हृदयात एक तीव्र भावना जागृत झाली.ते यमनेच्या मुख्य प्रवाही आले होते.तिचं रूप सौंदर्य ते आपल्या लोचनी मनात साठवत होते.
"सत्यवती,तुझं सौंदर्य अलौकिक आहे. मदनमंजिरी तुझ तारूण्य कुणा ही पुरूषाला आकृष्ट करीन असेच आहे."महर्षी पराशरच्या त्या सौंदर्य स्तुतीने ती लज्जित झाली.
"मुनीवर..!! कृपा असू द्यावी " त्या,अल्लडअजाण सुकुमारीला काय कल्पना पुढं काय काय,तिच्या आयुष्यात नियतीने रेखून ठेवले आहे.
त्यांनी मत्सगंधेकडे पाहिले आणि सौम्य स्वरात म्हणाले, “सत्यवती, तुझ्या सौंदर्यात आणि शुद्धतेत मला एक दैवी उद्देश दिसतो.माझ्यासोबत संबंध कर." महर्षी पराशरची मागणी सत्यवतीला अनपेक्षित होती.
सत्यवतीच्या डोळ्यांत आश्चर्य आणि भीती यांचा मेळ दिसला.ती एक साधी मुलगी होती, जिचे आयुष्य यमुनेच्या लाटांवर आणि मासेमारीच्या साध्या जीवनात गुंतले होते.तिच्या मनात पराशरांच्या शब्दांनी एक द्वंद्व निर्माण केले.ती संकोचत म्हणाली, “महर्षी, तुम्ही सिद्ध तपस्वी आहात आणि मी केवळ एक कोळयाची अतिसामान्य कन्या आहे.हे मिलन मला सामाजिक लांच्छनात टाकेल.माझे कौमार्य भंग झालेतर समाज मला कधीच स्वीकारणार नाही आणि माझ्या देहाला हा मासळीची दुर्गंध आहे.हे तर तुम्ही जाणताच अहात."
तिच्या शब्दांत एक साधेपणा भाबडेपणा होता.ते सत्य होतं.सत्यवती काहीचं लपून ठेऊ इच्छित नव्हती.पराशरासारख्या तपस्व्यापासून ती काय लपवून ठेऊ शकत होती? पराशराचं योग सामर्थ्य ती जाणत नव्हती पण त्यांच्या मुद्रेवर चकाकणारे तेजचं साक्ष देत होते हे कुणी असामान्य दैवी पुरूष आहे. 'satywati ekshapit kumari'
तिच्या डोळ्यांत सामाजिक बंधनांची भीती होती हे स्पष्ट दिसतं होतं पण त्याचबरोबर तिच्या हृदयात एक शुद्धता होती जी पराशरांना जाणवली.त्यांनी तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि सांगितले, “सत्यवती, तुझ्या चिंता मला समजतात.मी माझ्या तपोबलाने तुझ्या सर्व शंकांचे निराकरण करेन.कोणीही आपले मिलन पाहणार नाही.”
सत्यवतीच्या मनात विश्वास आणि संकोच यांचा संघर्ष सुरू होता.ती एका अनोख्या द्वंद्वात सापडली होती.एक साधी भोळी कुमारिका ती,जी आपल्या साध्या जीवनात समाधानी होती पण एक तपस्वी ज्याच्या शब्दांत तिला दैवी नियतीचा संदेश ऐकू येत होता.अखेर,पराशरांच्या तेजस्वी नजरेत आणि सौम्य शब्दांत तिला विश्वास वाटला.
"मुनीवर, प्रणय आणि असा उघड्यावर? प्रणयाला एकांत हवा ना?"
"मी वचन देतो.आपला प्रणय कुणाच्याही दृष्टीस येणार नाही." ते धीर गंभीर आवाजात बोलले.
"ते कसं? आपण तर यमुनेच्या मुख्यप्रवाहात आहोत.अन्य नावा ही आहेत.त्या नावात ही लोक आहेत.तीरावर पण काही लोक दृष्टीस येत आहेत." मत्सगंधेची शंका योग्य होती.कोणतीच ललना एकांताशिवाय प्रणयास राजी होणार नाही.तिच्या मनात भितीच्या अनेक लाटा उसळत होत्या तर यमुनेत पाण्याच्या...!!
"सुकुमारे,तुझं भय व लज्जा निर्माण होणं मी जाणतो.ते स्वभाविक आहे.आपला प्रणय कुणाच्या ही दृष्टीस येणार नाही.तू प्रणयासाठी तत्पर रहा." पराशर तिला हा विश्वास देत असले तरी मत्सगंधेला विश्वास बसतं नव्हता. "सत्यवती: एक शापित कुमारी"
"माझं कोमार्यभंग पावेल. कौमार्य भंग झाल्यावर मला कोण वरेल? तो कंलक मला आयुष्यभर घेऊन जगावं लागेल.कदाचित मला सामाजिक उपेक्षेला ही तोंड दयावं लागेल." सत्यवतीने मनातलं भय उकलून दाखवलं.
"माझं वचन तुला. तुझं कौमार्य आपल्या मिलनानंतर ही पुन्हा परत येईल. तुझ्या परतीसाठी ते अबाधित असेल." कौमार्यभंग होणार नाही यामुळे सत्यवतीला धीर आला.
"मुनीवर,माझा देह अपवित्र आहे.त्याला मासळीचा दुर्गंध येतो.मला सारे मत्स्यगंधा म्हणून संबोधतात.या अपवित्र देहासह मी कशी रत होऊ?" सत्यवतीनं मनातला खेद व्यक्त केला.आपल्या देहास येणा-या दुर्गंधीने जर मुनीवर नाराज होऊन जर त्यांनी काही शाप दिला तर? ही भितीपण सतूयवतीला होतीचं. आपल्या देहाचा दुर्गंध ती लपवून कशी ठेऊ शकत होती.
" सत्यवती,तुझा दुर्गंध कामाचा जाईल.त्या दुर्गंधाचे रूपांतर एका सुगंधात होईल.तो सुंगध काही योजने पर्यंत पसरेल.तुला लोक मत्सगंधा नाहीतर योजनागंधा नावाने ओळखतील." आपल्या देहाचा हा दुर्गंध जाणार.. त्याऐवजी सुगंध येणार हे ऐकूनच तिच्या चेहरा हर्षोल्लासाने ओथंबून आला होता.
" आपल्या मिलनानंतर होणारा संतान? त्याला समाज स्वीकारेल? त्याचं संगोपन कसे करू?"
सत्यवतीच्या मनात एक गेला की दुसरा प्रश्न उभा राही.कोणत्या ही कुमारिका हे प्रश्न पडणारच ना?
" तो पुत्र असेल.या जगात विद्वान पुरूष म्हणून तो नावा रूपाला येईल.है मिलन हा दैवीयोग आहे.सत्यवती, तू निसंकोच राहा." पराशरच्या धीर गंभीर आवाजात एक आज्ञा होती व अश्वासन ही होतं.
पराशराने,आपल्या तपोबलावर तिथे धुक्याच्या झालरी विणायला सुरू केलं. वारं अजून मंद झालं.धूकं इतकं गडद होतं गेलं की तिला पुढचं काहीचं दिसेना. अकाशातला सूर्य,पण,दृष्टीक्षेपात येत नव्हता.ती विस्मयाच्या खोल गर्तेत बुडतं चालली होती.पराशर मात्र प्रणयातुर नजरेनं तिला पहात होते.
सत्यवतीच्या हातातलं वल्हं तसचं राहिलं.यमुनेचा प्रवाह.. स्तब्ध झाला की काय? तिला विश्वास बसतं नव्हता.नौका एकदमच स्थिर झाली.ती एका व्दीपावर होती.यमुनेच्या मध्यभागी हे व्दीप? इथं तर कधी ही द्विप नव्हतं. हे आलं कुठून? ती आवाक होऊन पहात राहिली. आपण असामान्य पुरूषासोबत आहोत.हे मिलन अद्वितीय असणार हे तिला कळून चुकलं होतं.संकोचाचे पदर फिटत गेले की अपोआपचं विश्वासाचे धागे एक नात गुंफत जातात.
महर्षी पराशर तिला अजून ही विस्मयाच्या सागरात ढकलत होते. छे..!! तिचं स्वतः एका विलक्षणच प्रवाहात वाहत चालली होती.
यमुनने स्वतः त्यांच्यासाठी एक पवित्र मंच रचला होता.त्या भोवती घनदाट धुक्याचं आवरण पसरवलं होतं.
जणू शुभ्र धवल धूकाचा महाल तिथं तयार झाला होता.ज्यामुळे पराशर आणि सत्यवती बाहेरील जगापासून अलिप्त झाले होते.
पराशर प्रणयात्सुक नजरेने पहात होते.लज्जेचे पदर अपोआपच फिटतील गेले.
ते क्षणच तसे धूंदलले होते. पराशरांच्या व मत्स्य गंधेच्या प्रणयाचा बहर आला.वयोवृद्ध पण तेजस्वी पुरूष पराशर व मदनमंजिरी सुकुमार मत्स्यगंधा यांचा अलौकिक प्रणय रंगला. यमुना ही स्तब्ध झाली होती.त्या दैवी मिलनाला यमुना फक्त साक्षी होती. सूर्य ही ते मिलन पाहू शकला नाही.सत्यवती मनाने पूर्ण पराशराशी रत झाली.वयाचे बंधने कधीच तुटली होती. "सत्यवती: एक शापित कुमारी"
प्रणयाची धूंदी ओसरली.भान जागे झाले.भयाचे सावट मत्स्यगंधेच्या चेह-यावर दाटले.
"मुनीवर..!!हे काय झाले? माझ्या गर्भात आता तुमचे बीज आहे."ती रडू लागली.
"माझा पत्नी म्हणून स्वीकार करा." ती हात जोडून उभी होती.
"हे मिलन दैवी होते.तुझ्यापोटी एक पुत्र जन्म घेईल.तो सामान्य नसेल?या जगात विद्वान असेल.कृष्णद्वैपायन"
"माझ कौमार्य?"
"ते अबाधित आहे.तू तुझ्या मनात दाटलेले भय दूर कर.तुझं कौमार्य भंग नाही.तुझ्या पतीसाठी ते अबाधित आहे."
त्याक्षणी पराशरांनी सत्यवतीला जवळ घेतले.तिला वरदान दिले.तिच्या देहातून यापुढे मासळीची दुर्गंध नव्हे, तर यमुनेच्या कमळांप्रमाणे एक मोहक सुगंध येईल.त्या सुगंधाने सत्यवतीच्या मनातील लज्जा आणि असुरक्षितता हळूहळू विरघळलीआणि ती ‘योजनगंधा’ बनली.जिचा सुगंध योजन दूरपर्यंत पसरत होता.
त्या गूढ द्वीपावर, यमुनेच्या लाटांच्या साक्षीने, सत्यवती आणि पराशर यांचे मिलन झाले.हे मिलन केवळ शारीरिक नव्हते तर त्यात एक आध्यात्मिक आणि दैवी उद्देश होता.
#सत्यवती-एक- शापित- कुमारी
"तू एका राजाची राणी होशील.तुझ्या वंशात पराक्रमी वीर जन्माला येतील. तू एकटी असली तरी तुझा पुत्र कृष्णद्वैपायन तुझ्यासेवेसाठी सदैव तत्पर असेल.तो वेद व्यास म्हणून नावाला येईल.तो जग प्रख्यात असेल."
सत्यवतीच्या हृदयात एक अनोखी भावना जागृत झाली.ती प्रेम होती,भक्ती होती आणि नियतीच्या स्वीकाराची भावना होती.तिच्या मनात पराशरांबद्दल आदर आणि श्रद्धा निर्माण झाली पण त्याचबरोबर एक अनामिक वेदना होती. पराशरचा विरह तिला सहन होणारा नव्हता. पराशरने तिच्या डोळ्यांत भव्य स्वप्नं पेरले होते. कदाचित ते विधिलिखित ही असेल पण तिच्या ह्रदयात एक असीम वेदना होती.तिचं ती काय करणार होती?
ती यमुनेच्या काठावर उभी राहिली, तिचे डोळे त्या लाटांकडे लागले जिथे तिच्या आयुष्याचा एक नवा अध्याय लिहिला गेला होता.तिच्या मनात प्रश्न उभे राहिला.आपल्या प्रेमाला आणि तिच्या त्यागाला काय अर्थ होता?
पराशर एक लसलसतं दुःख कायम तिच्या काळजात डागून गेले होते. नियतीचा हा शाप असेल, नाही?नियती किती क्रूर असते नाही?
परशुराम सोंडगे,बीड
या व अशा अनेक कथा वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला फालो करा
Blog:shabdgandha.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा